संत्रा फळबाग योजनेतंर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारण्याबाबत
प्रस्ताव सादर करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाने राज्यातील नागपूर जिल्हयातील नागपूर, काटोल व कळमेश्वर तर अमरावती जिल्हयातील मोर्शी, बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे यास मान्यता देवून 20 कोटी रुपये निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, खाजगी उद्योजक आणि बाजार समिती यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने पहिल्या टप्यात प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पासाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरु केलेली आहे. या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा तसेच मॉडेल प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषि पणनमंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्याबाबतची सूचना पणनमंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ संबंधित तालुक्यातील जास्तीत-जास्त लाभार्थींनी घ्यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या मुख्यालयाशी 020-24528100 या दूरध्वनी क्रमांकावर प्रकल्प विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.








